Wednesday, 21 October 2009

आपल्या मनातील भावना जेव्हा शब्द रुपाने बाहेर पाडतात तेव्हा निर्मान होते ती कविता...कविता हा माझ्या कायमच जिव्हाळ्याचा भाग राहीला आहे. हा ब्लॉग माझा एक प्रयत्न आहे आवड्लेल्या कवितांना सादर करण्याचा ...
यातील कविता Orkut/Blog/मी साठवलेल्या आहेत. त्या आपल्या समोर सादर करत आहे .....




कणा

‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!


कवी - कुसुमाग्रज


समिधाच सख्या या...

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||


कवी - कुसुमाग्रज


दु:ख ना आनंदही - आरती प्रभू

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.
याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.


पाउस - ग्रेस

पाउस कधीचा पडतो
झाडांचि हलति पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यत ऊतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडाला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेन
हि शुभ्र फुलांचि ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापशी
पाउस असा कोसळला

सन्दिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यवरती
लाटंचा आज पहारा

सांग मला रे सांग मला - ग. दि. माडगूळकर

सांग मला रे सांग मला

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !


एका तळ्यात - ग.दि.माडगूळकर

एका तळ्यात

एका तळ्यात होती बदले पिले सुरेख

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे

सर्वाहूनि निराळे ते वेगळे तरंगे

दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक

आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥

पिल्लस दु:ख भारी भोळे रडे स्वत:शी

भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी

जे ते तयास टोची दावी उगाच धाक

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥

एकेदिनी परंतु पिल्लास त्या कळाले

भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले

पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक

त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक


तेच ते नि तेच ते - विंदा करंदीकर

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते


सागरा, प्राण तळमळला - विनायक दामोदर सावरकर

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...


अशी ही दोन फुलांची कथा - यशवंत देव

अशी ही दोन फुलांची कथा

अशी ही दोन फुलांची कथा
एक शिवाच्या पदी शोभते । एक शवाच्या माथा ॥

इथला निर्माल्यही सुगंधी,तिथली माळहि कुणी न हुंगी
इथे भक्तिचा वास फुलांना, तेथे नरकव्यथा ॥

जन्म जरी एकाच वेलिवर, भाग्यामध्ये महान अंतर
गूळखोबरे कुणा, कुणाला मिळे पिंड पालथा ॥

दोन फुलांचे एकच प्राक्तन, उच्च नीच हा भास पुरातन
एक शिळेला देव मानिते । एक पूजिते म्रॄता ॥

निर्माल्य कुणी मंदिरातला, अर्पियला गंगामाईला
जरा पलिकडे, स्मशानातला, पाचोळाही वाहत आला
फुलाफुलांची ओळख पटली । हसला जगन्नियंता ॥


पाऊस

तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही,
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला,
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रूसवा तुझा,
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची,
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा,
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही


कवी - संदीप खरे.


हसलो म्हणजे...

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दु:खी नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फक्त स्वत:च्या फजितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळी;
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही.

हसतो कारण तुच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहरयाला काही शोभत नाही;
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही.

हसतो कारण दुसऱ्यानाही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते 'खरे' वाटते;
हसलो म्हणजे फक्त दाखवली फुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही.

हसतो कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे;
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.


कवी - संदीप खरे


पाऊस - सौमित्र

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.





आठवण...
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

No comments:

Post a Comment